विकासाचा मुखवटा, पदांची महत्त्वाकांक्षा खरी कारणीभूत; अमोल बालवडकरांच्या पक्षत्यागावर भाजपाचा खुलासा
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांच्या पक्षत्यागामागील खरे कारण काय, याचा पर्दाफाश करणारी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली. विकासाचे मुद्दे पुढे करत करण्यात येणारे आरोप हे केवळ दिशाभूल करणारे असून, पदांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण न झाल्यामुळेच अमोल बालवडकर यांनी पक्ष सोडल्याचा गंभीर आरोप भाजपाने यावेळी केला.विकासाचा मुखवटा, पदांची महत्त्वाकांक्षा खरी कारणीभूत; अमोल बालवडकरांच्या पक्षत्यागावर भाजपाचा खुलासा
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, महापौरपद किंवा स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा पूर्ण न झाल्यानेच अमोल बालवडकर यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे, तथ्यहीन आणि जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे भाजपाने ठामपणे सांगितले.
या पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक ०९ चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. लहू गजानन बालवडकर व श्री. गणेश कळमकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी श्री. प्रकाश बालवडकर आणि श्री. राहुल कोकाटे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्रितपणे अमोल बालवडकर यांनी केलेल्या आरोपांचे सविस्तर आणि तथ्यात्मक खंडन केले.
भाजपाच्या नेत्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत अमोल बालवडकर कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय नव्हते आणि राजकीयदृष्ट्या ते पूर्णतः अनुपस्थित होते. आज विकासाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आतापर्यंत कोणती विकासकामे केली, हे जनतेसमोर मांडावे आणि भविष्यातील ठोस आराखडाही स्पष्ट करावा, असे आवाहन भाजपाने केले.
“भारतीय जनता पार्टी हा पदांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही त्यांनी पक्षाशी निष्ठा राखली आहे,” असे मत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
तसेच विधानसभेच्या निवडणुकीपासूनच अमोल बालवडकर यांची पक्ष सोडण्याची मानसिकता होती आणि त्यांनी पक्षावर दबाव आणण्याचा हुकूमशाही पद्धतीचा प्रयत्न केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. “या आव्हानाला आम्ही प्रचाराचा नारळ फोडून आणि प्रत्यक्ष विकासकामांतून उत्तर देत आहोत,” असे भाजपाच्या उमेदवारांनी सांगितले
प्रभाग क्रमांक ०९ मधील मतदारांनी विकासालाच प्राधान्य देण्याचा ठाम निर्णय घेतला असून, ही संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवरच लढवली जाईल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केला.


