पुणे महानगरपालिका निवडणूक : प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकर यांचा ‘बिडकर पॅटर्न’ चर्चेत
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल) येथील उमेदवार आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी अनोख्या आणि शिस्तबद्ध प्रचार पद्धतीने लक्ष वेधले आहे. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ घरोघरी थेट संपर्क साधताना त्यांनी सुमारे २० लाख पावले चालून प्रभागातील जवळपास ६० हजार नागरिकांशी किमान तीनदा प्रत्यक्ष संवाद साधला आहे.पुणे महानगरपालिका निवडणूक : प्रभाग २४ मध्ये गणेश बिडकर यांचा ‘बिडकर पॅटर्न’ चर्चेत
बिडकर यांच्या स्मार्टफोनवरील फिटनेस अॅपनुसार, या कालावधीत त्यांनी दररोज सरासरी १०,५११ पावले चालली आहेत. हे काम जुलै २०२५ पासून सुरू झाले असून, प्रभाग मध्यवर्ती भागात असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक काळात पारंपरिक पदयात्रा टाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
प्रचारादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बिडकर यांनी पदयात्रा नको असे ठरविले होते. त्याऐवजी नियमित घरोघरी भेटींवर भर दिला आहे. या काळात त्यांनी प्रभागातील अनेक नागरिकांच्या घरीच सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण घेतले. डिसेंबरमध्ये पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतरही संपर्कात खंड पडू दिला नाही.
याबाबत बोलताना बिडकर म्हणाले, “नियमित व्यायाम आणि नियंत्रित आहारामुळे मी संपूर्ण काळ फिट राहू शकलो. या २० लाख पावलांमध्ये मला पंढरपूर वारीच्या चार वारी इतके आशीर्वाद मिळाले, याचे अधिक समाधान आहे,” असे ते म्हणाले.
प्रभागात विविध धर्म, जाती आणि आर्थिक स्तराचे नागरिक असून, पदयात्रा टाळून केलेल्या या ‘बिडकर पॅटर्न’ चे नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे. शेवटच्या टप्प्यात पदयात्रा आणि जाहीर सभांचे आयोजन केल्याने प्रभागातील लोकांनी भाजपा उमेदवारांचे स्वागत केले.
गणेश बिडकर पुढे म्हणाले, “प्रभाग २४ मध्ये विविध धर्माचे, अठरापगड जातींचे आणि विविध आर्थिक स्तर असलेले मतदार आहेत. या सर्व स्तरांतल्या मतदारांनी पदयात्रा टाळून केलेल्या प्रचाराच्या बिडकर पॅटटर्नचे कौतुक केले याचे समाधान आहे. मी चाललेली वीस लाख पावले ही प्रभागाच्या आणि पुण्याच्या प्रगतीसाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे.”
या अनोख्या जनसंपर्क अभियानामुळे बिडकर यांची प्रभागातील पकड अधिक घट्ट झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात त्यांचा विजयाचा दावा अधिक बळकट झाला आहे.


