Daily UpdateNEWSPune | NEWS

प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपची भव्य जाहीर सभा; विकासाभिमुख वचननाम्याचे प्रकाशन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Post

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या जाहीर सभेत प्रभाग क्रमांक ०९ साठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख जाहीरनाम्याचे (वचननाम्याचे) अधिकृत प्रकाशन करण्यात आले. वचननामा तयार करताना प्रभागातील प्रत्येक भागातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विकासाच्या गरजा तसेच भविष्यातील आव्हाने यांचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, नागरिकांच्या अपेक्षा आणि मागण्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

यावेळी उमेदवार लहू गजानन बालवडकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आपली ठाम भूमिका मांडली. “प्रभागात विकासाची गती वाढवायची असेल तर भारतीय जनता पार्टीला निवडून देणे अत्यावश्यक आहे. पुणे महानगरपालिकेचा महापौरही भाजपचाच असेल, त्यामुळे शहरासह प्रभागाचा विकास अधिक वेगाने होईल. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ आणि कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा निर्धार आहे. २०१९ पासून मी सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून अनेक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध लोकहिताचे उपक्रम राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे,” असे बालवडकर यांनी स्पष्ट केले.

वचननाम्यात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, सुरक्षित व अपघातमुक्त रस्ते, पादचारी सुविधा, अत्याधुनिक मल्टीलेव्हल पार्किंग, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, तसेच अतिक्रमणमुक्त फूटपाथ यांसारख्या महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच स्वच्छ, झिरो-वेस्ट आणि पर्यावरणपूरक प्रभाग घडवण्यासाठी कचरा विलगीकरण केंद्रे, आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, वृक्षारोपण आणि हरित पट्ट्यांची निर्मिती करण्याचा ठाम संकल्प मांडण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’, दर तीन महिन्यांनी जनसंवाद सभा, २४ तास कार्यरत जनसेवा कार्यालये, तसेच सौर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रभावी वापर अशा लोकाभिमुख निर्णयांचाही वचननाम्यात समावेश आहे. रस्ते बांधणीपूर्वी PMC, MSEB, मेट्रो आणि इतर यंत्रणांमध्ये समन्वय साधून टिकाऊ व दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क व सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, तरुणांसाठी क्रीडा संकुले, ओपन जिम आणि वाचनालये, बेबी डे-केअर सेंटर्स, पाळीव प्राण्यांसाठी पेट्स केअर सेंटर्स, बसस्टॉपचे नूतनीकरण, ड्रग्समुक्त प्रभाग, तसेच बाणेर–बालेवाडी–पाषाण–सुस–महाळुंगे परिसरासाठी स्वतंत्र विशेष विकास आराखडा यांचा या वचननाम्यात समावेश करण्यात आला आहे.

निवडणुकीनंतर तात्काळ विकासकामांना सुरुवात करून पुढील पाच वर्षे नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या विकासाच्या संकल्पाला जोरदार पाठिंबा दिला.

या वेळी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे यांच्यासह मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, ज्योतीताई कळमकर, राहुल कोकाटे, शरद भोते, नारायणजी चांदेरे, अनिकेत चांदेरे, सुहासजी भोते, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, सचिन सुतार, महेशजी सुतार, रोहन कोकाटे, सचिन दळवी, शिवम बालवडकर तसेच युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.