बोपोडी परिसराचा विकास स्मार्टसोबत आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत नेणार – सनी विनायक निम्हण
बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्ट सुविधांपुरता मर्यादित न ठेवता तो आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित जीवनशैलीपर्यंत विस्तृत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ठाम ग्वाही भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिली आहे.बोपोडी परिसराचा विकास स्मार्टसोबत आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत नेणार – सनी विनायक निम्हण
बोपोडी परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना सनी विनायक निम्हण यांनी हा आश्वास दिला. यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सनी विनायक निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसरात सुसज्ज अंतर्गत रस्ते, सुरक्षित आणि रुंद पदपथ, अद्ययावत उद्याने आणि क्रीडांगणे यांसारख्या स्मार्ट शहरातील आवश्यक सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जातील. मात्र विकास केवळ भौतिक सुविधांपुरता न राहता नागरिकांच्या दैनंदिन आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या बाबींनाही प्राधान्य दिले जाईल.
या अनुषंगाने नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा, सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा तसेच कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व प्रभावी नियोजन ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्यपूर्ण, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण हाच खऱ्या अर्थाने नगर विकासाचा पाया असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना सनी विनायक निम्हण म्हणाले की, माझे राजकारण विभाजनाचे नाही तर विश्वासाचे आणि विकासाचे आहे. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे संस्कार माझ्यावर आहेत. त्यामुळे या निवडणुकीदरम्यान दिलेली प्रत्येक ग्वाही प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे.
यासोबतच त्यांनी विकासकामांसाठी १०० दिवसांचा ठोस आणि कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या कामांची नियमित प्रगती नागरिकांसमोर मांडली जाईल, जेणेकरून पारदर्शकता आणि विश्वास कायम राहील, असेही सनी विनायक निम्हण यांनी स्पष्ट केले.
बोपोडी परिसरातील सर्वांगीण, शाश्वत आणि आरोग्यकेंद्रित विकासासाठी मांडलेली ही भूमिका आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.


