पुणे सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प, प्रभाग ८ मधून भाजपाचा प्रचार जोमात
भारतीय जनता पक्ष हा केवळ निवडणुकीपुरता सक्रिय असलेला पक्ष नसून, वर्षातील ३६५ दिवस आणि २४ तास जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे. पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवायचे असेल, तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला कोणताही पर्याय नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री व पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.पुणे सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प, प्रभाग ८ मधून भाजपाचा प्रचार जोमात
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या संयुक्त उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ बोपोडीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या दर्शनाने करण्यात आला. यावेळी सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड आणि सपना आनंद छाजेड हे चारही उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमास शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह भाजप व आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेमार्फत अनेक विकासकामे करण्यात आली असून शहराला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यामुळे आज प्रत्येक घरात सरकारी योजनांचा थेट लाभ पोहोचलेला दिसतो. भाजप सत्तेसाठी नव्हे, तर जनसेवेसाठी राजकारण करतो, हेच आमचे ब्रीद आहे.
यावेळी उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, स्वर्गीय मंत्री चंद्रकांत छाजेड साहेबांचा सर्वसमावेशक विचार आणि स्वर्गीय आमदार विनायक निम्हण साहेबांची काम करण्याची ऊर्जा घेऊन आम्ही प्रभागाचा समतोल व सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजांवर विशेष भर देण्यात येईल. बोपोडी परिसरातील महापालिकेच्या दोन दवाखान्यांचा दर्जा उंचावून ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, तसेच दर्जेदार शिक्षणासाठी ई-लर्निंग स्कूलची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन विकास करण्याचा आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्या राज्य आणि देशात डबल इंजिन सरकार कार्यरत आहे. पुणे शहराच्या विकासाला अधिक गती द्यायची असेल, तर महापालिकेतही भाजपला बहुमत देऊन ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे शहर विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर निश्चितच आगेकूच करेल.


